राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध | Rashtriya Ekatmata Marathi Nibandh 

तुम्हा सर्वान साठी राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध लिहिला आहे (Rashtriya Ekatmata Marathi Nibandh) . या निबंध मध्ये राष्ट्रीय एकता चे काय महत्व आहे हे व्यक्त केले आहे.  तुम्हाला हा निबंध नक्की आवडेल.

rashtriya ekatmata marathi nibandh

या निबंध चे शीर्षक "राष्ट्रीय एकात्मता" किंवा "राष्ट्रीय एकात्मता-काळाची गरज" किंवा "राष्ट्रीय एकात्मता-आजची सर्वश्रेष्ठ निकड" असे पण असू शकते. 

राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध

' आम्ही सारे भारतीय आहोत ' अशी प्रतिज्ञा आम्ही विद्यार्थी रोज घेत असतो. ही प्रतिज्ञा आमच्या पाठ्यपुस्तकांतही सुरुवातीस छापलेली आहे; पण आज प्रत्यक्ष चित्र काय दिसते? अलीकडे आम्हांला आमच्या इतिहासाचा विसर पडला आहे असे वाटते. ' आम्ही सारे भारतीय आहोत' या भावनेतून निर्माण झालेल्या संघभावनेच्या प्रचंड सामर्थ्याच्या जोरावर आपल्याला आपला भारत स्वतंत्र करण्यात यश लाभले. यासाठीच लोकमान्य टिळक, महात्मा गांधी या नेत्यांनीही आग्रह धरला तो राष्ट्रीय एकात्मतेचा !

त्या वेळी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि दूवारकेपासून आसामपर्यंत सारा भारत स्वातंत्र्याच्या एकाच ध्येयाने प्रेरित झाला होता. या एकतेपुढेच बलाढ्य परकी सत्तेला नमते घ्यावे लागले. स्वातंत्र्योत्तर काळातही, जेव्हा जेव्हा आमच्या देशावर परकीय आक्रमण आले, तेव्हा तेव्हा आम्ही सारे भारतीय एकजुटीने शत्रूवर तुटून पडलो. या एकात्मतेच्या भावनेमुळेच नैसर्गिक संकट, सामाजिक आपत्ती व परकीय आक्रमण अशा अरिष्टांवर आपण सहजपणे मात करू शकलो. 

आजचे चित्र मात्र वेगळेच दिसत आहे. परकीय राष्ट्रांच्या चिथावणीने आमच्या काही देशबांधवांनी दहशतवाद स्वीकारला आहे. काहीजणांनी राजकीय स्वार्थापोटी लोकांच्या धर्मभावना चेतवल्या आहेत. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशातील आम्ही नागरिक धर्माच्या नावाखाली आमच्याच देशबांधवांच्या जिवावर उठलो आहोत. गांधीजींच्या अहिंसक भारतात आज  हिंसेने थैमान मांडले आहे. अनेक भाषा हे भारताचे आगळेवेगळे वैशिष्ट्य असल्याने आम्ही भाषावार प्रांतरचना स्वीकारली. पण आज संकुचित विचारसरणीत अडकलेले आम्ही राज्याराज्यांतील सीमावादावरून एकमेकांचे हाडवैरी झालो आहोत. हे सारे  चित्र एवढे भयानक आहे की आता आमच्या एकसंध भारताची पुन्हा एकदा फाळणी तर होणार नाही ना, अशा भयप्र शंकेची पाल मनात चुकचुकते.

आज पुन्हा एकदा राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव देणारे प्रभावी सामूहिक नेतृत्व उदयाला येणे जरुरीचे आहे. प्रत्येक भारतीयात राष्ट्रीयत्वाची भावना प्रज्वलित झाली पाहिजे. राष्ट्रीयत्वाचे हे बाळकडू प्रत्येक . भारतीयाला मिळाले, तरच आमच्यातील विद्वान तरुण परदेशात चिरवास्तव्य करणार नाहीत. आमच्या देशातील गुपिते परदेशात विकली जाणार नाहीत. देशाला ग्रासणारा भ्रष्टाचाराचा भस्मासुर नष्ट होईल. चोरट्या मार्गाने आणलेल्या परकीय मालाची खरेदी करून स्वतःच्या देशाला बुडवले जाणार नाही. ' राष्ट्र म्हणजे मी व मी म्हणजे राष्ट्र' अशी एकात्मतेची भावना ज्यायोगे दृढ होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. थोडक्यात, राष्ट्रीय एकात्मता ही आजची खरी निकड आहे.


Read

मानवता हाच खरा धर्म मराठी निबंध

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध

आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध

आजचा विद्यार्थी ज्ञानार्थी कि परीक्षार्थी मराठी निबंध

विज्ञान शाप कि वरदान मराठी निबंध

Post a Comment

Previous Post Next Post